अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्याचा राज्यकारभार सुरु - एकनाथ शिंदे
अहिल्यानगर, 31 मे (हिं.स.)। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या विकासासाठी न
Dcm


अहिल्यानगर, 31 मे (हिं.स.)।

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची घोषणा केली. अहिल्यादेवींचा न्याय, लोककल्याण, सेवाभाव आणि मानवतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित आणि सांस्कृतिक पुनर्जागरण या सरकारच्या प्राधान्यक्रमांचा पुनरुच्चार केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडपुते, आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या, तर लोकमाता, न्यायप्रिय आणि जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या युगप्रवर्तक होत्या. त्यांच्या कार्याचे स्मरण झाले की न्याय, धर्म, लोककल्याण आणि आदर्श राज्यकारभार डोळ्यांसमोर उभा राहतो, असे सांगत शिंदे यांनी त्यांच्या जीवनकार्याला अभिवादन केले.

चौंडीच्या विकासासाठी राज्य सरकारने सुमारे 1200 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चौंडी

हे केवळ गाव नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि इतिहासाचे पवित्र स्थळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्यादेवींच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याला त्यांचे नाव देण्याची मागणी होताच महायुती सरकारने तातडीने निर्णय घेत जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे केल्याची आठवण त्यांनी करून दिली. “पाहू, बघू” अशी भूमिका न घेता त्वरित निर्णय घेणे ही आमची कार्यपद्धती असल्याचे सांगत त्यांनी शासनाच्या निर्णयक्षमतेवर भर दिला.

यावेळी बोलताना शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या उपक्रमांचाही गौरव केला. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील भव्य राम मंदिर, केदारनाथ पुनर्विकास यांसारख्या प्रकल्पांमुळे भारताचा सांस्कृतिक स्वाभिमान अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींनी तीनशे वर्षांपूर्वी देशभर मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे कार्य केले होते. त्याच विचारांचा वारसा आजही पुढे नेला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या विचारांचा विस्तार संपूर्ण देशभर केला, असे सांगत शिंदे यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. धर्म, संस्कृती, न्याय आणि मानवतेचा समन्वय साधणाऱ्या अहिल्यादेवी आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे ते म्हणाले.

अहिल्यादेवींनी तलवारीपेक्षा न्यायावर, सत्तेपेक्षा सेवाभावावर आणि वैभवापेक्षा जनकल्याणावर विश्वास ठेवला. अनेक वैयक्तिक दुःख आणि संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी समाजकारण आणि लोककल्याणाचा मार्ग सोडला नाही. त्यामुळे तीनशे वर्षांनंतरही संपूर्ण देश त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे शिंदे म्हणाले.

जलसंवर्धन आणि लोककल्याणाच्या क्षेत्रातही अहिल्यादेवींची दूरदृष्टी अधोरेखित करताना शिं

दे म्हणाले की, तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी विहिरी, तलाव, घाट आणि जलव्यवस्थापनाची कामे केली. आज राज्य सरकार जलयुक्त शिवार, जलसंधारण आणि विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून त्याच विचारांना पुढे नेत आहे. गोदा-नर्मदा जोड प्रकल्प हा केवळ विकासाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि जलसंवर्धनाचा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही देत त्यांनी पिकविमा योजना, शेतकरी सन्मान योजना आणि विविध कृषी कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत आणि राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, स्त्री ही केवळ घराची शक्ती नसून संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी शक्ती आहे. अहिल्यादेवींनी महिलांना स्वावलंबन, नेतृत्व आणि कर्तृत्वाची प्रेरणा दिली. त्याच विचारातून राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून, कोणाच्याही विरोधामुळे ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande