हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची घेतली भेट
कोलकाता, 31 मे (हिं.स.)।पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळी येथे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी हे टीएमसी कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी निवेदन देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झ
हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची घेतली भेट


कोलकाता, 31 मे (हिं.स.)।पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळी येथे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी हे टीएमसी कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी निवेदन देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या.

पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तत्काळ कल्याण बॅनर्जी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी एकजूट व्यक्त केली.

टीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले, “हिंसा आणि धमकावण्याच्या माध्यमातून आम्हाला गप्प बसवता येईल, असे ज्यांना वाटते त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही. प्रत्येक हल्ला सत्य आणि न्यायासाठीच्या आमच्या लढ्याला अधिक बळकटी देतो.”पक्षाने पुढे म्हटले, “सत्य कायमचे दडपले जाऊ शकत नाही आणि न्याय नाकारला जाऊ शकत नाही. आम्ही मागे हटणार नाही.”

रविवारी कल्याण बॅनर्जी हे एका शिष्टमंडळासह चंडीतळा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी त्यांचा विरोध करत काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याच दरम्यान त्यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात “चोर-चोर” अशा घोषणा देण्यात आल्या. हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी हे आपल्या समर्थकांसह धरणे आंदोलनाला बसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी आरोप केला की, चंडीतळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी हा प्रकार आपली हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला. कल्याण बॅनर्जी म्हणाले, “चंडीतळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी मी कारने जात होतो. चंडीतळा बाजारात मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मी माझ्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यासोबत (पीएसओ) पायी चालत होतो. यावेळी भगव्या कपड्यांतील १० ते १५ भाजप समर्थकांनी अचानक घोषणाबाजी सुरू केली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. ते मला शिवीगाळ करत होते, मात्र मी पुढे चालत राहिलो. त्याच वेळी कोणीतरी माझ्या डोक्यावर दगड फेकला.” ते पुढे म्हणाले, “मी रस्त्यावर कोसळलो. त्या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने मला वाचवले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

कल्याण बॅनर्जी यांनी राज्य पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “पश्चिम बंगाल पोलीस पूर्णपणे मूकदर्शक बनून उभे होते. त्यांनी हे सर्व घडू दिले. राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे पूर्णपणे अराजकतेचे वातावरण आहे. हा माझ्या हत्येचा प्रयत्न होता.”

यापूर्वी रविवारी टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अभिषेक बॅनर्जी हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडितांची भेट घेण्यासाठी गेले असताना ही घटना घडली होती. त्यांच्या दौऱ्यादरम्यान काही लोकांनी गोंधळ घालत त्यांच्याशी धक्काबुक्की केली, कपडे फाडले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande