संजय राऊतांनी उरलेसुरले फुसके लवंगी फटाके सांभाळावे आणि मगच पोकळ धमक्या द्याव्या - नवनाथ बन
मुंबई, 25 जून, (हिं.स.)। बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणाऱ्या जनाब संजय राऊत यांच्या हे लक्षात येत नाही की, आता आपल्याकडे बॉम्ब नाहीत आणि सुतळी बॉम्बही उरलेले नाहीत. उरले ते केवळ फुसके लवंगी फटाके. त्यामुळ
संजय राऊतांनी उरलेसुरले फुसके लवंगी फटाके सांभाळावे आणि मगच पोकळ धमक्या द्याव्या - नवनाथ बन


मुंबई, 25 जून, (हिं.स.)। बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणाऱ्या जनाब संजय राऊत यांच्या हे लक्षात येत नाही की, आता आपल्याकडे बॉम्ब नाहीत आणि सुतळी बॉम्बही उरलेले नाहीत. उरले ते केवळ फुसके लवंगी फटाके. त्यामुळे वायफळ बडबड करायची, पोकळ धमक्या द्यायच्या एवढेच तुमचे काम उरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाकिस्तानवर हल्ला करताना कुणाची परवानगी घेत नाहीत. पाकिस्तानलाही धडा शिकवतात. जनतेनेही तुम्हाला धडा शिकवलाय. त्यामुळे आधी उरलेसुरले फुसके लवंगी फटाके सांभाळा आणि मगच इतरांना धमक्या द्या, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी एकत्र करण्याच्या नादात पडण्यापेक्षा उबाठा गट एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण उबाठा गटात भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे गटतट विभागले गेले आहेत. उबाठा गटाची चार शकले पडली आहेत, संजय राऊतांनी ती आधी सांभाळावीत आणि मग महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करावा, असे बन यांनी सुनावले.

बन पुढे म्हणाले, संजय राऊत आणि काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला. ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे’ असे म्हणत भाजपाची, विश्व हिंदू परिषदेची, राम मंदिर आंदोलनाची खिल्लीही उडवली. आता या कथित दानपेटी प्रकरणात तुम्ही भाजपावर आरोप करत आहात. परंतु या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. दानपेटीच्या कथित घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राम मंदिराला, प्रभू रामचंद्रांच्या विचारांनाच विरोध असल्याने काँग्रेस राम मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला जनाब संजय राऊत साथ देत आहेत. मात्र, देशातील 140 कोटी जनतेची श्रद्धा प्रभू रामचंद्रांवर आहे. तुम्ही कितीही राम मंदिराची आणि त्या संदर्भात खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

जनाब संजय राऊत यांच्यावर एवढी दुर्दैवी वेळ आली की ते आणीबाणीचेही समर्थन करू लागले आहेत. आणीबाणीचा काळा इतिहास पुस्तकांमध्ये आला तर तुमचे पोट का दुखते? तुम्ही आता जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही टीका करू लागला आहात. आणीबाणीत सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला. त्यांना घरात, तुरुंगामध्ये डांबले होते, हा काळा इतिहास पुस्तकांमधून जनतेसमोर आलाच पाहिजे. तुम्ही काँग्रेसचे गुलाम झाल्याने तुम्हाला आणीबाणी योग्य वाटते. पण एक लक्षात घ्या. आता आणीबाणी तुमच्या पक्षामध्येच आलेली आहे. तुमच्या पक्षात एक माणूस उरलेला नसल्याने आपल्या पक्षातील आणीबाणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा. विनाकारण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या नादाला लागून आणीबाणीचे समर्थन करू नका. यात तुमचे तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बन यांनी राऊत यांना फैलावर घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande