
नवी मुंबई , 04 जून (हिं.स.)। प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पातील लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी व प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्राधान्य द्या अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल (वाढवण बंदर अधिकारी) यांची प्रत्यक्ष भेट भेट घेऊन मागणी करत लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी आमदार तरे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी व विकासात्मक प्रकल्प असून या प्रकल्पाचा मोठा भाग माझ्या बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राशी निगडित आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांतील स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव, मच्छीमार समाज तसेच इतर प्रकल्पग्रस्त कुटुंबांवर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान तसेच भविष्यात प्रकल्पाशी संबंधित विविध लघु, सहाय्यक व पूरक कामे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत. यामध्ये वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, कार्यालयीन सहाय्य, बांधकामाशी संबंधित लघु कंत्राटी कामे, साहित्य पुरवठा, यंत्रसामग्री सहाय्य, भोजन व्यवस्था, लॉजिस्टिक सेवा तसेच इतर विविध सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्व कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी युवक-युवती, बेरोजगार तरुण तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
विकासाचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगार व व्यवसाय संधींचा लाभ त्यांना प्रथम मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी संबंधित सर्व विभाग, कंत्राटदार संस्था व एजन्सींना आवश्यक निर्देश देऊन लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल यांची प्रत्यक्ष भेट घरून लेखी निवेदन देऊन केली आहे.
दरम्यान जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल म्हणाले की, स्थानिकांना प्राधान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येतील. तसेच, स्थानिक युवकांना कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे प्रकल्पाविषयी स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल तसेच प्रकल्प आणि स्थानिक समाज यांच्यात समन्वय व सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे, असे दयाल म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर