
गांधीनगर , 27 जुलै (हिं.स.)।दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या कार्गो कंपार्टमेंटमधून धूर निघत असल्याची सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर विमानाचे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण १९४ प्रवासी प्रवास करत होते. विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या विमानाने २७ जुलै रोजी सकाळी ११:१९ वाजता दुबईहून उड्डाण केले होते आणि दुपारी ३:२६ वाजता राजकोट येथे उतरले. वैमानिकाला विमानाच्या कार्गो कंपार्टमेंटमधून धूर निघत असल्याची सूचना मिळाली होती. धुराची सूचना मिळताच काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वैमानिकाने तत्काळ निर्णय घेतला. आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमान मुंबईऐवजी राजकोट येथे उतरवण्यात आले. आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. सध्या कोणत्याही प्रवाशाला किंवा विमानाच्या कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच राजकोट विमानतळ प्रशासन सतर्क झाले. स्थानिक प्रशासनानेही तातडीने हालचाली सुरू केल्या. विमानतळाच्या धावपट्टीवर सर्व आपत्कालीन सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आल्या.
यासोबतच राजकोट अग्निशमन विभागाच्या अनेक अग्निशमन गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी तैनात करण्यात आले, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित सामोरे जाता येईल. प्रवाशांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथकही विमानतळावर दाखल झाले. याशिवाय, गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आणि संपूर्ण कारवाई सुरक्षितपणे पूर्ण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode