पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा - मुख्यमंत्री
मुंबई, 28 जुलै (हिं.स.) : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अध
मुंबई


मुंबई, 28 जुलै (हिं.स.) : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल या दृष्टीने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा (कोकण व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरिश्चंद्र भोये, आ.विनोद निकोले, आ. राजेंद्र गावित, आ. विकास तारे, आ.राजन नाईक, आ. देवयानी फरांदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत त्वरित उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा प्राधान्याने पूर्ववत कराव्यात. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावे.

ऊर्जा विभागांतर्गत महावितरण आणि संबंधित कंपन्यांनी वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत संरचनेची पुनर्रचना करावी. आपत्तीच्या काळातही अखंडित वीजपुरवठा राखता येईल, यासाठी तीनही वीज कंपन्यांनी उपाययोजना करताना इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन करावे. तसेच जलसाठे आणि पाण्याच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करावेत आणि त्यांचा विकास आराखड्यांमध्ये समावेश करावा. भविष्यात विकास परवानग्या देताना या अभ्यासाचा आधार घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वसई-विरार परिसरात अतिवृष्टीत पाणी साठवणारे 'होल्डिंग स्पॉट'

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वसई-विरार परिसरात अतिवृष्टीच्या काळात भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी वाहून जाण्यास विलंब होत असल्याने पाणी साठविण्यासाठी 'होल्डिंग स्पॉट' विकसित करण्यात यावेत. यासाठी लीज संपलेल्या जागा वापरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) च्या माध्यमातून महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत पालघरसाठी आराखडा तयार करण्यात यावा. त्यामुळे पायाभूत विकास अधिक सक्षम होईल आणि जागतिक बँकेचा निधी उपलब्ध करून घेण्यासही मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

येथील भूभागाचे मॅपिंग करून बेस मॅप तयार करावा. या नकाशांचा उपयोग विकास प्रकल्पांचे नियोजन, पाणी निचरा व्यवस्था आणि भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी करण्यात यावा. समृद्धी महामार्गाच्या कामात अशा प्रकारच्या नियोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून पालघरमध्येही त्याच धर्तीवर नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज

एकात्मिक मदत आराखड्यास तातडीने मंजुरी देण्यात येईल. यापूर्वी कोल्हापूर येथील महापूराच्या वेळी अशी मदत देण्यात आली होती. नुकसानग्रस्त घरे, दुकाने यांचे नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करावेत. रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तात्काळ व दीर्घकालीन मदतीच्या उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. या कामांसाठी आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालघरमधील मदत आणि पुनर्वसन कार्यात केंद्र शासन व राज्य शासनाचे विविध विभाग सहभागी असून या सर्व विभागांची संयुक्त आढावा बैठकही लवकरच घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंत्री महाजन यांनी अतिवृष्टी व महापुराच्या काळातील पालघर येथील मदत कार्यावर दृष्टीक्षेप टाकला. मंत्री गणेश नाईक यांनी वसई-विरार परिसरात पाण्याचे होल्डिंग स्पॉट विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते व दळणवळण व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्याबाबत सूचना केली. आमदार सर्वश्री हरिश्चंद्र भोये, राजेंद्र गावित, विकास तारे, राजन नाईक आणि विनोद निकोले यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या स्थानिक समस्या आणि सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती बैठकीत मांडली.

बैठकीस अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, ओ. पी. गुप्ता, विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, प्रधान सचिव एकनाथ डवले, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखर, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक भालचंद्र चव्हाण तसेच शासनाच्या विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande