
नाशिक, 05 जुलै (हिं.स.)।
उबाठाकडे आता कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या मागे जनता नाही, त्यामुळे ते आपले अस्तित्व दाखवण्यासाठी रामरक्षा आंदोलन करत आहेत. अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणाच्या एसआयटी चौकशीमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिक दौऱ्यावर रविवारी (दि. ५) मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याशी संबंधित कामे वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. मी आधीच नाशिककरांची माफी मागितली आहे, कारण काहीसा त्रास होणार आहे. मोठ्या प्रमाणावर नवीन कामे सुरू आहेत. कॅनाल रोडचे कामही सुरू आहे. मायॉक सर्कल परिसरात पूर्वी तात्पुरता रस्ता होता, मात्र आता दर्जेदार काम सुरू आहे. कुठेही तडजोड नाही, सर्वत्र रात्रंदिवस काम सुरू आहे. पावसामुळे काही अडचणी येतील, पण कामे सुरूच राहतील. सात-आठ हजार कोटींची कामे असल्याने ती लगेच पूर्ण होणार नाहीत. पुन्हा एकदा नाशिककरांची माफी मागतो, थोडा त्रास सहन करा, पुढे उत्तम सुविधा मिळणार आहे,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि तो त्यांना सांभाळावा लागेल. “ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, ज्यांना राहायचे आहे त्यांनी राहावे. जे राहिलेले आहेत ते थांबायला तयार नाहीत. दरवाजे बंद केले तरीही पदाधिकारी व कार्यकर्ते जातील. ते पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण घरात बसून बाईट देऊन पक्ष चालत नाही. राज्यभर फिरून काम करावे लागते, जे ते करत नाहीत. राजकारणात टिकायचे असेल तर मजबूत संघटन आवश्यक आहे. भाजपकडे मजबूत संघटन आहे म्हणूनच अनेक राज्यांत सत्ता आहे,” असे त्यांनी सांगितले. “पन्नास खोके, वीस खोके” असे आकडे मनमानीने सांगितले जातात. लोकांना अशा वक्तव्यांपेक्षा प्रत्यक्ष काम महत्त्वाचे आहे. आमचा पक्ष खुले आहे; ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे. मात्र पक्ष टिकवायचा असेल तर संघटनेवर लक्ष द्यावे लागेल.आमदार रोहित पवार यांच्या संदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, “माझ्यावर कारवाई होणार” असे आधी सांगणे योग्य नाही. जर काही चुकीचे किंवा बेकायदेशीर काम झाले असेल तरच कारवाई होते. अशा प्रकारची पूर्वसूचना देऊन कारवाई होत नाही.
म्यानमार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे लक्ष
सुमारे ९०० विद्यार्थ्यांना नोकरीसाठी म्यानमारला पाठवण्यात आले होते. मात्र तिथे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, केंद्र सरकारशी तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV