

रांची, 15 ऑगस्ट (हिं.स.)। झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात ऑटो-रिक्षा आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून घटनेची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
हा भीषण अपघात चंदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देढ तांगवा खोऱ्यात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑटो-रिक्षा चंदवाच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरला तिची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ऑटो-रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात ऑटोमधील सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑटोमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली. अपघाताची माहिती मिळताच चांदवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोरंजन प्रसाद सिंग पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काही प्रवासी कंटेनरखाली अडकल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करताना पोलिस आणि स्थानिक नागरिकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मृतांची ओळख पटताच त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत असून वाहनांच्या वेगासह इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे. एकाच अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule