
काठमांडू, 25 ऑगस्ट (हिं.स.)।नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार सत्तेवर आणणारी जेन-जी पिढी आता याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नेपाळमध्ये नव्या सरकारला अद्याप १५० दिवसही पूर्ण झालेले नाहीत, मात्र बालेन शाह यांना जनतेचा रोष, संसदेचा दबाव आणि पक्षातील नाराजीचा सामना करावा लागत आहे.
बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तरुण आंदोलक पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काठमांडूतील माइतीघर मंडल येथे जमले.विरोधी पक्षाचे खासदारही बालेन शाह यांना घेरताना दिसत आहेत. संसदेच्या बैठकींना त्यांच्या वारंवार गैरहजेरीवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत.सभापती डोल प्रसाद अर्याल यांनी २६ ऑगस्ट रोजी बालेन शाह यांना संसदेत उपस्थित राहून खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या ३९ संसदीय बैठकींपैकी बालेन शाह केवळ पाच बैठकींना उपस्थित राहिले आहेत.
बालेन शाह यांनी २७ मार्च रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयांमुळे पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बालेन शाह यांच्या सरकारच्या स्थापनेपूर्वी जी जेन-जी पिढी त्यांच्या समर्थनार्थ उभी होती, तीच आता त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. बालेन शाह यांच्या एका निर्णयामुळे नेपाळच्या सीमावर्ती शहरांमध्येही विरोध प्रदर्शन सुरू झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना या निर्णयात काही प्रमाणात शिथिलता आणावी लागली.
भारतासोबतच्या नेपाळच्या सीमा विवादावरूनही बालेन शाह यांना सातत्याने टीकेचा सामना करावा लागला आहे. भारताच्या भूभागात नेपाळकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधक नाराज झाले. भारताच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण नेपाळमध्ये झालेल्या हिंसक सांप्रदायिक संघर्षांमुळे बालेन शाह यांच्यावरील दबाव आणखी वाढला. या घटनेवर उशिरा प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाल्यानंतर बालेन शाह यांना देशाला संबोधित करावे लागले.
पोखरामध्ये माजी गोरखा सैनिकांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात नेपाळी नागरिकांची रखडलेली भरती पुन्हा सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याची मागणी कायम ठेवली आहे.दरम्यान, या तणावाचा परिणाम बालेन शाह यांच्या पक्षातही दिसून येत आहे. आरएसपी मधील खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेपासून शाह यांनी घेतलेले अंतर तसेच त्यांच्या एकतर्फी निर्णय घेण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.आरएसपी खासदार जगदीश खरेल यांनी संसदेत बोलताना पक्षाच्या अंतर्गतच बालेन शाह यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “केवळ पंतप्रधानांची प्रतिष्ठा कायम राहिली, तर सरकार टिकणार नाही. आमची प्रतिष्ठाही कायम राहिली पाहिजे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode