
* महिला, बालके आणि विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन
पुणे, 31 ऑगस्ट (हिं.स.) - भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वपूर्ण योजना व उपक्रम सुरू केले आहेत. शैक्षणिक सुविधांमुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. मात्र, समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकापर्यंत योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी अधिक लक्ष्यित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भटके-विमुक्त समाजातील महिलांना सामाजिक व आर्थिक वंचिततेबरोबरच लिंगभेदाचाही सामना करावा लागतो. या भेदभावाचे स्वरूप समजून घेऊन त्याविरोधात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचे शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता आणि कायदेविषयक जागरूकता यासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक उपक्रम राबविले पाहिजेत.
उपजीविकेसाठी गावोगावी फिरून वस्तूंची विक्री करणाऱ्या समाजातील नागरिकांकडे संशयाने पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सन्मान आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे. युवकांसाठी अनेक योजना असल्या तरी काही विद्यार्थी आणि बालके लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारी संकलित करून कोणताही घटक मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचबरोबर भटके-विमुक्त समाजातील विविध जाती-जमातींच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन महिला, बालके आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आखले पाहिजेत. योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास अधिकाधिक नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
“पारंपरिक वेशभूषा, स्वतंत्र बोलीभाषा, कला आणि लोकसंस्कृती ही भटके-विमुक्त समाजाची समृद्ध ओळख आहे. तिचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र, आपली ओळख केवळ वेशभूषेपुरती मर्यादित नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या प्रकाशात अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणादेखील आपल्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
समाजातील नव्या पिढीने शिक्षणाची कास धरून मुख्य प्रवाहात पुढे यावे, आपल्या बोलीभाषा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करावे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या विकासासह समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी शासन आणि संबंधित विभागाला आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
या कार्यक्रमाला राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे तसेच भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी