
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल बुधवार आणि गुरुवार (दि. २ आणि ३ सप्टेंबर) असे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यादरम्यान त्या जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण, महसूलविषयक कामकाज, मतदान केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्या घेणार आहेत.
पहिल्या दिवशी, बुधवारी विभागीय आयुक्त चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल होतील. तेथे त्या मतदान केंद्र व नगर परिषद/ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देतील.
दुपारी त्या चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघातील शाळेतील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळच्या सत्रात त्या राजापूर पालिका व स्थानिक मतदान केंद्रांची पाहणी करतील व त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी त्या कणकवलीकडे (सिंधुदुर्ग) रवाना होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी