सहा जणींच्या बंडखोरीची झलक; ‘बंडखोर’च्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष
मुंबई, 01 सप्टेंबर (हिं.स.)। सहन करणं, गप्प राहाणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं… स्त्रीच्या वाट्याला आलेल्या या चौकटी आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. याच विषयावर भाष्य करणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. स्वत
सहा जणींच्या बंडखोरीची झलक; ‘बंडखोर’चं नवं पोस्टर चर्चेत


मुंबई, 01 सप्टेंबर (हिं.स.)। सहन करणं, गप्प राहाणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं… स्त्रीच्या वाट्याला आलेल्या या चौकटी आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. याच विषयावर भाष्य करणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. स्वतःसाठी उभं राहाण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची हिंमत दाखवणाऱ्या या सहा स्त्रिया ‘बंडखोर’च्या या पोस्टरमध्ये दिसत आहेत. या पोस्टरने चित्रपटाच्या आशयाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

पोस्टरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या सहा जणी एका वेगळ्याच रुबाबात दिसत आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून जाणवतो. त्यांची ही बंडखोरी नेमकी कशा विरोधात आहे, त्यांचा हा बेधडकपणा कुठून आला आणि त्यांच्या या वृत्तीमुळे कथेत काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच निर्माण झाली आहे.

‘बंडखोर’ हे या सहा पात्रांच्या स्वभावाचीच ओळख असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट होतं. अन्यायाविरोधात आवाज उठवणं, मनाविरुद्ध गोष्टींना ठामपणे नकार देणं आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं, ही या सहा जणींची वृत्ती आहे. त्यामुळे बंडखोरी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग आहे. या सहा जणींचा वेगळा स्वभाव आणि बेधडक वृत्ती दाखवणारं हे पोस्टर चित्रपटाबद्दलचे कुतूहल वाढवत आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “‘बंडखोर’मधल्या या सहा जणी केवळ पडद्यावरची पात्रं नाहीत, तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या स्वभावातच एक स्पष्टपणा आहे. चुकीचं वाटत असेल तर त्या त्याला विरोध करतात आणि स्वतःच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेताना कुणाच्या परवानगीची वाट पाहात नाहीत. त्यांची ही बेधडक वृत्ती, त्यांचे वेगळे स्वभाव आणि आयुष्याकडे पाहाणयाचा त्यांचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे ‘बंडखोर’ची गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे.”

संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या सहा ‘बंडखोर’ स्त्रियांची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande