
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
कर्जाच्या ओझ्यातून पतसंस्था स्वावलंबनाच्या वाटेवर
चेअरमन महादेव खिचडे यांचे प्रतिपादन
पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत सभासदांचा विश्वास आणि संचालक मंडळाची प्रामाणिक साथ यामुळे औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने शून्यातून कर्जमुक्ती पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करीत संस्थेवर असलेले सुमारे १५ कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज पूर्णपणे फेडून पतसंस्था स्वावलंबी झाली असल्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी औसा शिक्षक पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. औसा शक्षिक पतसंस्थेच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यीक गुरुवर्य इंद्रजीत देशमुख प्रमुख हे वक्ते म्हणू उपस्थित होते मंचावर ह.भ.प. दत्तात्रय पवार गुरुजी, पंचायत समिती
सभापती सौ. गंगाबाई कोदळीकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख म्हणाले की, आधुनिक शिक्षणात भावना, आपुलकी आणि संवाद कमी होत चालल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जगात जाऊन त्यांच्याशी एकरूप होण्याचे आवाहन केले. मोबाईल आणि स्क्रीनचा अतिरेक टाळून कुटुंब, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन महादेव खिचडे यांनी संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. सभासदांना दिलेल्या वचननाम्यातील संस्था स्वावलंबी करू या वचनाची पूर्तता संस्थेच्या सुवर्ण महोत्सवीच्या वर्षी करत संस्था स्वावलंबी करून कर्जमर्यादा १५ वरून २० लाख, तातडीचे कर्ज ५० हजारांवरून ८० हजार करण्यात आल्याचे सांगून, यावर्षीही भागभांडवलावर ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा करीत सभासदांच्या विश्वासामुळे पतसंस्थेने प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. दत्तात्रय पवार गुरुजी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुवर्ण महोत्सवी वार्षिक सभेत सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप, गुणवंत सभासद शिक्षकांच्या पाल्यांचा, संस्थामित्र सभासदांचा शाल, पुष्पहार देऊन
सन्मान करण्यात आला. तसेच कर्ज जीवन हमी योजनेच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis