
बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.)। संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५-२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत धारूर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता आवरगाव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी समितीकडून तपासणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागातून आवरगाव ग्रामपंचायतीने प्रथम, तर जारंडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे आवरगाव ग्रामपंचायत आता बीड जिल्ह्याचे राज्यस्तरीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे. गावातील स्वच्छता, ग्रामविकास तसेच विविध लोकाभिमुख उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची
दखल घेत हा क्रमांक मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आवरगाव ग्रामपंचायतीने यापूर्वीही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय तपासणी समितीकडून गावातील स्वच्छता व ग्रामविकासाच्या कामांची पाहणी होणार असून, या तपासणीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या यशाबद्दल सरपंच अमोल जगताप यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis