- बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती
मुंबई, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः तर 31 तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपदग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपदग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 251 पूर्णतः व 31 अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर तर सप्टेंबर 2025 मध्ये जवळ जवळ 39 लाख हेक्टर अशा सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर