धाराशिव, 16 ऑक्टोबर (हिं.स.)धाराशिव जिल्हा नियोजन समिती सभागृहात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. बाधित ३४ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ९ हजार हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे. या बाधित शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी खरडून गेलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करता यावी यासाठी कृषी तज्ज्ञांकडून एक महिन्याच्या आत अहवाल मागवा, असे निर्देश दिले.
खरडून गेलेल्या जमिनीवर हायड्रोफोनिक शेती कशी करता येईल याचा दूरदृष्टीने अभ्यास करण्यात यावा. पंचनामे करताना मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीने मदत करावी. पुरामुळे ज्या विहिरींचे नुकसान झाले आहे, परंतु त्या विहिरींची नोंद सातबारावर नाही अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी. विहिरीचे नोंद सातबारावर नाही त्यांची नोंद तातडीने घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याबाबत व केलेल्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis