छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाडा पदवीधर निवडणूक नोंदणी अभियानातून अधिकाधिक सुशिक्षित युवकांनी राजकीय प्रक्रियेत सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.
मराठवाडा दौऱ्यादरम्यान जालना येथे भारतीय जनता पार्टी जालना महानगर व जालना ग्रामीण या संघटनात्मक जिल्ह्यांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व पदवीधर निवडणूक नोंदणी अभियान या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विविध अभियानांची उद्दिष्टे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच आगामी काळात कार्यकर्त्यांनी घ्यायच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली. व्यापारी वर्गाला दिलासा व पारदर्शकता मिळून व्यापार क्षेत्रात गती येणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान युवक-स्त्रियांसाठी रोजगारनिर्मिती व स्वावलंबनाची दिशा दाखवणार आहे.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास बापू खरात, माजी महापौर भगवान घडामोडे, आत्मनिर्भर भारत अभियानाचे मराठवाडा संयोजक समीर राजूरकर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis