परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।परभणी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तसेच स्वच्छता विभागाच्या पथकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत प्रभावित नागरिकांना पाण्यातून सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे. सखल भागातील पाणी मोटारपंपांच्या सहाय्याने उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली असून सुरक्षित स्थळी आश्रय घेतलेल्या नागरिकांसाठी चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सुरक्षित स्थळीच राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis