
मुंबई, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) : जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
अपघातानंतर काही मिनिटांतच महावीर हॉस्पिटल, कामशेत येथे जखमींना दाखल करण्यात आले. शासनाच्या आपत्कालीन उपचार आदेश (ETI) प्रक्रियेच्या माध्यमातून तत्काळ शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे कोणत्याही रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचार, औषधे आणि रुग्णालयीन सेवा या सर्व सुविधा शासनाच्या सहाय्याने पूर्णपणे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत.
या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखवलेली संवेदनशीलता “आरोग्य हक्क — सर्वांसाठी!” या शासनाच्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ग्रामीण आणि वारकरी समाजालाही अत्याधुनिक उपचार सेवा सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.
महावीर हॉस्पिटल प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वयातून काम करत सर्व जखमींना तातडीने सेवा उपलब्ध करून दिली. शासनाकडून आवश्यक सुविधा, औषधांचा पुरवठा आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यात आली आहे.
या घटनेतून शासनाच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेबद्दलची बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर