
नांदगाव, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पाच दिवसांत देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. पण सलग चार दिवसांपासून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुळात उमेदवारी अर्जच क्लिस्ट आणि किचकट असल्याने नाकी नऊ येत आहेत. याशिवाय या तयारीसाठी विविध दाखले घेण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, विविध दाखले घेण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. नांदगाव नगरपालिकेच्या १० प्रभागांतून २० नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष
पदासाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष सुरू केलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते दाखले आणि ना हरकत प्रमाणपत्र, संपत्तीचे विवरण, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा दाखला यासह सुचक अनुमोदक यांची थकबाकी नसल्याचे दाखले घेणे, निवडणुक खर्चासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करुन तज्ज्ञ वकिलांमार्फत उमेदवारी अर्ज भरुन ब्राह्मणाकडून काढलेल्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याची तयारी काही इच्छुकांनी सुरु केली आहे. पालिकेच्या कक्षात टेबलवर अर्ज स्विकृतीची व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दि. १८ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होवून पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV