
मुंबई,, 20 नोव्हेंबर (हिं.स.) भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त, कल्याण येथील साईनंदन इन हॉलमध्ये कल्याण-डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने महिलांचे भव्य व प्रेरणादायी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी या संमेलनाला दूरदृश्यप्रणालीने संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी शिल्पी अरोरा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन नाईक, सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, सचिव सुरेंद्र आढाव, महिला उपाध्यक्षा उज्वला साळवे, श्रुती म्हात्रे, कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, विमल ठक्कर महिला काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष शबाना शेख आदी उपस्थित होते.
भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता मिळवते. निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. सध्या सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस मोठ्या बहुमताने वियजी होईल असा विश्वासही संध्याताई सव्वालाखे यंनी व्यक्त केला.
या संमेलनातून महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी इंदिराजींच्या असामान्य कार्याचा, त्यांच्या धैर्यशाली नेतृत्वाचा आणि महिलांना दिलेल्या प्रेरणेची उजळणी करून दिली. महिलांची समाजातील सजग भूमिका आणि एकात्मतेचा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
कल्याणमधील बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी शिल्पा अंबादे यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर