
कोल्हापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेकरिता काही विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव परीक्षेला बसू न देण्याचा आदेश शिवाजी विद्यापीठाने दिला होता. त्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी सनदशीर मार्गाने लेखी निवेदने देऊन व उपोषण करून देखील विद्यापीठाने परीक्षेस बसण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर आठ विद्यार्थ्यांनी मा उच्च न्यायालय मुंबई यांचे कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर दि २१/११/२०२५ रोजी सुनावणी होऊन मा. न्यायमूर्ती कर्णिक व मा. न्यायमूर्ती कडेथनकर यांचे न्यायपीठाने सदर विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेऊन सदर विध्यार्थ्यांना तूर्तास परिक्षेस बसू देण्याचे आदेश शिवाजी विद्यापीठास दिले. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचणार आहे.
या विद्यार्थ्यांच्या तर्फे ॲड. अभिजीत अडगूळे, ॲड. विराज नलवडे, ॲड. गिरीश मुजुमदार, ॲड. शर्वरी टिपुगडे, ॲड. तन्वी लाड, ॲड. के डी शिराळे यांनी काम चालवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar