रत्नागिरीत वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदनाचे उद्घाटन
रत्नागिरी, 14 डिसेंबर (हिं.स.) | विधी सेवा सदनामुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद निवारण करणे सुसह्य होणार आहे, असे मार्गदर्शन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले. जिल्हा व सत्र न्या
वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदनाचे रत्नागिरीत उद्घाटन


रत्नागिरी, 14 डिसेंबर (हिं.स.) | विधी सेवा सदनामुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद निवारण करणे सुसह्य होणार आहे, असे मार्गदर्शन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.

जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी सेवा सदनया वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, जिल्हा न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिरुद्ध फणसेकर, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती जामदार पुढे म्हणाले, मोफत कायदेशीर मदत प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल. न्यायालयीन तरतुदींच्या आधारे काही वेळा न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे पक्षकार समाधानी होत नसतात. अशावेळी न्यायालयीन पूर्ववैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होणारी तडजोड कायम स्वरूपाची असते. त्यामुळे पक्षकारांमध्ये असणाऱ्या वादांचे निवारण वैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

न्यायालयीन तरतुदींच्या आधारे न्याय देण्यासाठी समाजाला न्यायालयांची गरज आहे. पण वाद निवारण केंद्र, लोकअदालत यांसारख्या न्यायालयीन पूर्व वाद मिटवणाऱ्या संस्थांचीही तितकीच गरज आहे. याद्वारे होणाऱ्या निवाड्यांमुळे न्यायालयांवरचा ताण कमी होईल. अलीकडच्या काळात न्यायालयीन दाव्यांचे स्वरूप बदलले असल्यामुळे काही वेळा न्यायालयीन तरतुदींना मर्यादा येत असतात. अशा वेळी सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी वैकल्पिक वाद निवारण केंद्रासारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा वैकल्पिक केंद्रांच्या यशासाठी न्यायाधीश, वकील व पक्षकारांची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही न्यायमूर्ती जामदार म्हणाले.

प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांना जलद, परवडणारा व समाधानकारक न्याय मिळवून देणे हे नालसाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. तसेच विक्रमी दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यास मदत व मार्गदर्शन केल्याबद्दल पालक न्यायमूर्ती जामदार यांचे आभार मानले.

जिल्हा सरकारी अभियोक्ता फणसेकर यांनी वैकल्पिक वाद निवारण, लोक अदालत याद्वारे न्याय मिळविण्याची प्रक्रिया जलद गतीने होत असल्याचे सांगितले.

पूर्वीच्या काळी पारावरच्या न्यायाची संकल्पना ही आताच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्रात अंतर्भूत असल्याचे बार असोसिएशचे अध्यक्ष पाटणे म्हणाले.

यावेळी वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत न्याय मिळालेल्या दाम्पत्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी या इमारतींच्या बांधकामादरम्यान मदत झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुलकर्णी व त्यांच्या पथकाचे आभार मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील व विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande