
साडेतीनशे वर्षांचा इतिहास
लातूर, 14 डिसेंबर (हिं.स.)।
चाकुरातील पाटील यांच्या गढीला साधारण तीनशे ते साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे चाकूरच्या गढीचे वैभव सर्वदूर पोहोचले. मुळात महान व्यक्तिमत्त्वासोबत परिसरही मोठा होतो. परिसराला वैभव प्राप्त होते. त्यानंतर ते वैभव एकट्याचे राहत नाही. पाटील यांच्या गढीचेही तसेच झाले आहे. या गढीच्या परंपरेतील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर, त्यांच्या निधनाने आज चाकूरची गढी पोरकी झाली.
राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचलेले शिवराज पाटील चाकूरकर जेव्हा केव्हा चाकूरला यायचे, तेव्हा डोळे भरून गढीकडे पाहायचे. जणू ते गडीशी काही तरी हितगुज करीत आहेत, असेच वाटायचे.
. एकेकाळी येथे सालगडीही सोन्याच्या पावलांनी वावरायचे. गायीच्या हंबरण्यालाही तुपाचा वास होता. इथल्या नाण्यांच्या खणखणाटावर लक्ष्मी ही थिरकायची. या वाड्याचे वैभव असलेले शिवराज पाटील आज आपल्यात नाहीत, ही कल्पना मनाला प्रचंड दुःख देणारी आहे.
गढी झाली जीर्ण
साडेतीनशे वर्षे जुन्या असलेल्या गढीची स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. गढीच्या मध्यभागी खूप धन असल्याचे सांगितले जाते. वाड्याच्या भितीदेखील दक्षिणेकडे वाकल्या आहेत. त्या केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. या गढीत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पाऊलखुणा आहेत. त्यांच्या निधनाने ही गढी पोरकी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis