
लखनऊ, 17 डिसेंबर (हिं.स.)।राहुल गांधी यांच्याविरोधात रायबरेली येथे सुरू असलेला एक खटला आता लखनौला वर्ग करण्यात येणार आहे. पुढील सुनावणी लखनऊ येथील विशेष न्यायालयात होणार आहे. यासंदर्भात इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने बुधवारी सुनावणीनंतर आदेश दिला.
न्यायमूर्ती बृजराज सिंह यांच्या एकसदस्यीय पीठाने याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या स्थानांतरण अर्जावर सुनावणी करून हा निर्णय दिला. भाजप कार्यकर्ता एस. विग्नेश शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या कथित ब्रिटिश नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकरणात त्यांनी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीवर रायबरेली येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती.
मात्र, शिशिर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा खटला लखनऊ येथील विशेष न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. रायबरेलीमध्ये आपल्याला जीविताला धोका असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच स्थानिक परिस्थितीमुळे निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नसल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले होते.
सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत रायबरेलीतील न्यायालयात सुरू असलेला हा खटला लखनऊच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्याची विनंती करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करून प्रकरणाच्या स्थानांतरणाचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode