
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील महत्त्वाकांक्षी लातूर कल्याण 'जनकल्याण द्रुतगती महामार्ग' हा बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरणार आहे. राजकीय दबावामुळे या मार्गाची दिशा बदलण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, अशी जनभावना आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवली आहे. मूळ प्रस्तावानुसार हा मार्ग लातूर अंबाजोगाई - केज - बीड - जामखेड अहिल्यानगरमार्गे कल्याण असाच राबवण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. बीड जिल्हा आधीच दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतराच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत हा महामार्ग जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचे १० ते १२ तासांचे अंतर ५ ते ७तासांवर येणार आहे. इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून राजकीय दबाव होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis