
नवी मुंबई, 4 डिसेंबर, (हिं.स.)। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष–२ यांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी करत तब्बल ८,९२,५७४ रुपये किंमतीचे ५३ हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांकडे सुखरूप परत केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे शाखेने हा शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी नोंदवल्या जातात. या तक्रारींनंतर पोलिसांकडून मोबाईलची माहिती केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर अपलोड केली जाते. या पोर्टलद्वारे गहाळ मोबाईलची IMEI माहिती प्राप्त झाल्यावर गुन्हे शाखेकडून तांत्रिक तपास सुरू होतो.
मोबाईलमध्ये नवीन सिमकार्ड वापरले गेले की त्याचा नंबर पोर्टलवर दिसताच, संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून मोबाईलची वस्तुस्थिती समजावून सांगत मोबाईल परत मिळवण्याची प्रक्रिया राबवली जाते. सप्टेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले ५३ मोबाईल शोधून काढण्यात गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मिळालेल्या या मोबाईल फोनची पडताळणी करून ते आज त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून नवी मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
या मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही संपूर्ण कारवाई वपोनि अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली तसेच मपोहवा सुनिता चंदगीर, पोशि संतोष तांदळे आणि मपोशि स्नेहा गायकवाड यांनी दक्षतेने पूर्ण केली.
हरवलेले मोबाईल परत मिळवून देण्याची ही उपक्रमशील कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली असून, भविष्यातही अशीच सेवा सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके