सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून भगर व इतर उपवासाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. मात्र, अशा पदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) देसाई यांनी केले आहे. नवरात्र उपवासाच्या काळात खालील बाबींची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे : - पूर्णपणे शिजवलेलेच अन्नपदार्थ सेवन करावेत. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले पदार्थ टाळावेत, अन्यथा उलटी, जुलाब यासारख्या त्रासाची शक्यता असते. - शिळ्या अन्नाचे सेवन टाळावे. सकाळी बनवलेली भगर संध्याकाळी किंवा रात्री खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. - पॅकबंद व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. पॅकेटवरील उत्पादक तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासूनच खरेदी करावी. - खुल्या बाजारातील सुट्टे पीठ टाळावे. पॅकबंद भगर स्वच्छ करूनच घरगुती पीठ तयार करावे. - अन्नपदार्थ स्वच्छ वातावरणात व पिण्यायोग्य पाण्याचा वापर करून तयार करावेत. - फलाहारासाठी ताजी, योग्य प्रकारे साठवलेली व पिकवलेली फळेच निवडावीत. - दुध व दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात साठवलेले आहेत याची खात्री करूनच खरेदी करावी. (बासुंदी, रबडी, श्रीखंड, दही इ. फ्रिजमध्ये ठेवावेत.) - अन्न विषबाधा टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी. नवरात्र महोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असला तरी आरोग्यदृष्टीनेही सजग राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना व सेवन करताना वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड