लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील प्रमुख टपाल कार्यालयातील टपाल बुकिंग सुविधेची वेळ वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना टपाल कार्यालयामध्ये स्पीड, रजिस्टर, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल यासारखे टपाल देशांतर्गत आणि परदेशात पाठविण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे.
लातूर आरएमएस काउंटर येथे टपाल बुकिंगची पूर्वीची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत होती, ही वेळ वाढून आता दररोज दुपारी 4 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच लातूर प्रधान कार्यालयातील टपाल बुकिंगची पूर्वीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होती, ती आता सर्व कामाच्या दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. लातूर शहरातील टिळक नगर, हत्ते रोड, लेबर कॉलनी, लातूर बझार, लातूर रेल्वे स्टेशन, रामनगर, तसेच अहमदपूर, औसा, चाकूर, उदगीर आणि उदगीरगंज येथील टपाल कार्यालयातील टपाल बुकिंगची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होती, त्यामध्ये बदल करून आता सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात आली आहे, असे धाराशिव विभागाच्या लातूर मुख्यालयाचे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis