परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)।परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मातंग समाजाच्या वतीने सुरू असलेले धरणे सत्याग्रह उपोषण आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच असून, या आंदोलनाला लोकश्रेय मित्र मंडळ संस्थेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
या आंदोलनाची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, तसेच सकल मातंग समाजाच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लोकश्रेय मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी उपोषण स्थळी बोलताना केली. त्यांनी सांगितले की, उपोषण हा अत्यंत कठीण लढा आहे. दहा दिवसांपासून समाज बांधव आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर बसले आहेत. याकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. समाजाच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य करणे हीच खरी लोकशाही आहे.
या प्रसंगी लाल सेनाचे नेते गणपत भिसे, उत्तम गोरे, अशोक उबाळे, लक्ष्मण कदम, हेमंत साळवे, संविधान भिसे, तथागत झोडपे, कचरु कलवले आदींची उपस्थिती होती. आंदोलनस्थळी उपस्थित सर्वांनी एकमताने ठरवले की, प्रशासनाने मागण्यांची दखल घेतली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis