छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। निसर्ग कधी कोपेल हे सांगता येत नाही. नुकतेच मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावं जलमय झाली आहेत. शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले असून आणि शेकडो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे.
पश्चिम महाराष्ट्राने विशेषतः कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी अनेकदा अशा प्रलयकारी संकटाचा धीराने सामना केला आहे. त्याकाळात मराठवाड्यातील नागरिकांनी एकत्र येत मदत केली आहे. आजघडीला मराठवाड्याच्या मदतीला धावून जाणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जाणिवेतूनच कृष्णा उद्योग समूहाने देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.
कृष्णा समूहाच्यावतीने आवश्यक जीवनावश्यक वस्तू, धान्य, अन्नधान्य पॅकेट्स, कपडे, औषधे आणि स्वच्छतेच्या वस्तू अशा विविध साहित्याची मदत मराठवाड्यातील प्रभावित भागात पोहोचवण्यात आली असून सर्व ट्रक बीडला रवाना झाले आहेत. मदतीचा हा ओघ असाच सुरु राहणार असून आणखी साहित्याची जुळवाजुळव करून मदत पाठवली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis