अतिवृष्टी! पूरग्रस्त अहमदपूरकरांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप धारण केले. मन्याड नदीसह तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे श
अ


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप धारण केले. मन्याड नदीसह तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक गावांचा अहमदपूर शहराशी असलेला संपर्क तुटला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत दोन महिला अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, भर पावसात फिल्डवर उतरून जे गौरवशाली कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​ज्यावेळी अनेक नागरिक घरात सुरक्षित ठिकाणी थांबले होते, त्यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर या दोन कर्तव्यदक्ष महिला अधिकारी मदतीसाठी पुढे सरसावल्या.

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार!

​शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असतानाही, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यांनी केवळ कार्यालयात बसून सूचना दिल्या नाहीत, तर स्वतः भर पावसात, रस्त्यावर उतरून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि तातडीने मदत व बचाव कार्याला गती दिली.

चिलखा येथील मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मजुरांना सुखरूप बाहेर निघेपर्यत दोन्ही महीला अधिकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबत भर पावसात उभ्या राहुन बच्याव कार्यावर थेट लक्ष ठेवत होत्या

​पावसाचा जोर, तुटलेले रस्ते आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर असताना, या दोन महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेली कर्तबगारी, समर्पण आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे. प्रशासकीय काम आणि जबाबदारी पार पाडताना 'महिला' म्हणून कोणताही वेगळा विचार न करता, त्यांनी चोवीस तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

​पुराचे पाणी कमी झाल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू करणे, विस्थापित कुटुंबांना सुरक्षित निवारा आणि अन्न-पाण्याची व्यवस्था करणे, तसेच संपर्क तुटलेल्या गावांमध्ये मदत पोहोचवण्याचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले.

​उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी संकटकाळी केलेल्या या असाधारण कामगिरीबद्दल संपूर्ण तालुका त्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाचे नेतृत्व कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठच या दोन महिला अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande