सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मागील १५ दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सोलापुरात अल्पविरामानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत असून, पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. वाडकबाळ पुलावरील पाणी अद्याप ओसरलेले नसल्याने सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे. या ठिकाणी महामार्ग तळ्यासारखा दिसत असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड