
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भातील साहित्य सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पद्धतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 7 फेब्रुवारी पर्यंत निर्बंध असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम दि. 13 जानेवारी रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. त्यामुळे जिल्हा पारिषद व पंचायत समिती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स,कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जिल्हादंडाधिकारी श्री. जिंदल यांनी त्यांना असेलेल्या शक्तीचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घातले आहेत.
प्रत्येक व्यक्तीवर या आदेशांची अंमलबजावणी नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनिक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिद्धी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी