
मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत पार पडलेल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व घटकांचे सहकार्य लाभले. मुंबईकर मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावला. एकूणच संपूर्ण निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबईकर नागरिक, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, प्रसार माध्यम, सर्व यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केले.
या सहकार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, अपर जिल्हाधिकारी (कोकण विभाग) तथा महानगरपालिका निवडणूक समन्वयक सहायक फरोग मुकादम, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ नगरसेवक निवडीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण मिळून १० हजार २३१ मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच रॅम्प व मार्गदर्शक सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. एकूण ६४ हजार ३७५ मनुष्यबळाच्या प्रभावी व्यवस्थापनासह ४ हजार ५०० स्वयंसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
या निवडणुकीत मुंबई महानगरातील १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदारांपैकी सुमारे ५४ लाख ७६ हजार ०४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरूष मतदारांची संख्या २९ लाख २३ हजार ४३३ इतकी; महिला मतदारांची संख्या २५ लाख ५२ हजार ३५९ तर इतर मतदारांची संख्या २५१ इतकी आहे. एकूण ५२.९४ टक्के मतदानाची नोंद झाली.
संपूर्ण निवडणूक कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा व अधिकारी-कर्मचारी, कामगार अहोरात्र कार्यरत होते. यासोबतच मुंबई पोलीस दलातील सुमारे ३० हजार अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष बंदोबस्तात कार्यरत होते. तसेच केंद्र शासन, राज्य शासन, विविध प्राधिकरणे, बँका आणि निमशासकीय संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचारी, कामगार यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.
मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध व समर्पित कामगिरीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांमधील समन्वयामुळे मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली, असे त्यांनी नमूद केले.
लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या जबाबदारीमुळेच निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व प्रभावी ठरली आहे. भविष्यातही प्रशासकीय कामकाजात सर्वच घटकांचे अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर