
मुंबई, ४ जानेवारी (हिं.स.) : राज्यात एकूणच झुंडशाही सुरू झाली आहे, लोकशाही आता संपली आहे. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे, निवडणुका बिनविरोध होत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर धमक्या देतायत, हा विषय निवडणूक आयोगाने गांभिर्याने घेतला पाहिजे. अध्यक्ष कोणाच्या पक्षाचे नसतात, ते आमदारासारखे वागू शकत नाही. म्हणून अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. तसेच, नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा)-मनसेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या शिवशक्तीचा वचननामा आज प्रसिद्ध झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न आगामी निवडणुकांसाठी घातक पायंडा पडत आहे. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. हे उद्दाम वर्तन आहे. स्वत:ला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजतात. संरक्षण काढून घेण्याचा अधिकार त्यांना नसतो. निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांचे गुलाम समजले जातील, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
वरळी डोममध्ये काल डोमकावळे जमले होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरुन जोरदार टीका केली. मुंबईतील महापौर मराठीच होणार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील छोट्या कामाचा श्रेय घेण्यापेक्षा मोठ्या कामाचा श्रेय घ्यावं, अरबी समुद्र, गंगा आणली, कैलास पर्वत तुम्ही निर्माण केला हे श्रेय घ्या. समुद्रमंथन तुम्हीच आणला, असेही ठाकरे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी