
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
औसा नगरपरिषद परिषदेचे दिवंगत उपनगराध्यक्ष दिगंबर हरिभाऊ माळी यांची कन्या सौ. अश्विनी शेखर रासकर माळी यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा २०२६ या वर्षाचा महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अश्विनी रासकर माळी यांनी सत्यशोधक चळवळीचे जनक, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा जपत सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली. तसेच दुर्गा वाहिनी, राष्ट्र सेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेश पदावर कार्य करत असताना चुकीच्या विचाराला बळी पडून धर्मांतरित होणाऱ्या मुलींची सोडवणूक करण्याचे भरीव कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने अश्विनी शेखर रासकर माळी यांना यावर्षीचा महात्मा फुले महाराष्ट्ररत्न पुरस्कार एका भव्यसमारंभामध्ये सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. त्यांच्या या पुरस्कार बद्दल आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी गुरुजी औसा, सोसायटीचे माजी चेअरमन वसंतराव फुटाणे, सुशील कुमार बाजपाई, अरविंद कुलकर्णी, माधव सिंह परिहार, दत्तात्रेय माळी आणि पत्रकार राम कांबळे, महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर माळी, माळी समाजाचे अध्यक्ष सचिन माळी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis