
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)
आज शिक्षणाचे महत्त्व अनन्य असले तरी ग्रामीण, दुर्मिळ भागातील शाळांना चाप बसला असून शाळा बंद होण्याचे मार्गावर आहे, तर काही बंददेखील पडल्या आहे. याला महत्त्वाचे कारण मानल्या जात आहे इंग्रजी माध्यमातील शाळेचा व्याप व प्रभाव, त्याचप्रमाणे शासन प्राथमिक शिक्षणाबाबतचे आखत असलेले वेगळे धोरण तसेच शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या याला कारणीभूत ठरत आहे.
शासनाने २०१८ जानेवारी रोजीच राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे नजीकच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करून बंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये काटसूर, इसापूर, मालधूर, अमदाबाद, वंडली,चिखली, व्हरहा उर्दू या शाळांचा समावेश होता. तत्कालीन परिस्थितीत आमदार अॅड. यशोमती ठाकूर व काँग्रेस कार्यकर्त्यांनीया विरोधात भूमिका घेतली होती, तर पालकांनी आमचा विद्यार्थी दुसऱ्या गावात जाणार नाही, अशी कणखर आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे निर्णय थांबविण्यात आला होता. आज मात्र पुन्हा कमी पटसंख्येंच्या नावाखाली मराठी शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले जात असून पुढील शैक्षणिक सत्रापासून शाळा समायोजन करून कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची दारे बंद करण्याचा मार्ग अवलंबीत आहे.तिवसा पंचायतसमिती शिक्षण विभागाचे क्षेत्रात ७६ शाळा आहे. त्यापैकी इसापूर येथील शाळेत विद्यार्थीच नसल्यामुळे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मागील सत्रापासून बंद पडल्यामुळे आता ७५ शाळा कार्यरत आहे. यामध्ये जिल्हापरिषद व खाजगी अशा १६ शाळांतील विद्यार्थी पटसंख्या दहा व त्यापेक्षा कमी असल्यामुळे या शाळा शासनाच्या निर्णयानुसार बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. जिल्हापरिषद अंतर्गत येत असलेल्या शाळेमध्ये मजदी येथील प्राथमिक शाळेत ३ विद्यार्थी, ठुनी ४, वंडली ४, अमदाबाद ५, व्हरहा उर्दू शाळा ६, दृगवाडा ७. रघुनाथपूर ८, भारसवाडी ९, भांबोरा ९, उमरखेड १०, भारवाडी जुनी १० अशी विद्यार्थी संख्या आहे, तसेच खाजगी संस्थेच्या गुरुदेव विद्यामंदिर बोरडा हायस्कूलमध्ये१० विद्यार्थी, महात्मा फुले विद्यालय शिरजगाव मोझरी येथील हायस्कूलमध्ये १० विद्यार्थी, तिवसा बहुजन विकास या प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी, तर तीन ठिकाणी स्थलांतरित झालेल्या विद्यानिकेतन भिवापूर या हायस्कूलमध्ये केवळ पाच विद्यार्थी आहे. यामुळे तालुक्यातील या शाळांचे भवितव्य पुढील शैक्षणिक सत्रापासून धोक्यात असल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटनेमागील कारण पुढे करताना चर्चेदरम्यान जन्मदर घटला एक किंवा दोन मुले, तर ग्रामीण भागात वयाचे २५ ते ४० वर्षे होऊनही लग्न जुळत नसल्याची संख्या अधिक आहे. यामुळेसुद्धा अपत्य खुंटली, तर शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता शहराकडे धाव व इंग्रजी माध्यमांकडे कल, त्यातच ज्या गावात शाळा असताना तेथील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई योजनेंतर्गत एसटीचे मोफत पास मिळत असल्यामुळे मराठी शाळाची पटसंख्या कमी होत असल्याचे कारण पुढे येत आहे.
पटसंख्येअभावी बंदबाबतचा कोणताही प्रस्ताव सादर केला नाही. केवळ ठुनी-भारवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा एकत्रीकरण करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे.
चंद्रशेखर रामटेकेशिक्षण विस्तार अधिकारी, तिवसा पंचायतसमिती
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी