ऊस तोडणीसाठी मराठवाड्यात गेलेल्या मेळघाटातील मजुरांच्या मदतीसाठी बच्चू कडूंची धावाधाव
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असूनही मेळघाटातील तरूणांना रोजगाराअभावी स्थलांतर करावे लागते. काही लोक शहरांमध्ये जातात, तर काही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टयात ऊस तोडणीच्या कामासाठी जातात. ऊसतोड मजुरांच्या मुल
ऊस तोडणीसाठी मराठवाड्यात गेलेल्या मेळघाटातील मजुरांच्या मदतीसाठी बच्चू कडूंची धावाधाव..


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असूनही मेळघाटातील तरूणांना रोजगाराअभावी स्थलांतर करावे लागते. काही लोक शहरांमध्ये जातात, तर काही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टयात ऊस तोडणीच्या कामासाठी जातात. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसते. मुलांना आई-वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी नेले जाते.

ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना ठवेले जाते. त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नसते. शासन मात्र आम्ही ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देतो, असे सांगते. प्रत्यक्षात शासनाची यंत्रणा ऊसतोड मजुरांच्या मुलांपर्यंत पोहचत नसल्याचे चित्र दिसून येते. वर्षभर कितीतरी महिने परगावी काबाडकष्ट करणारा आदिवासी मजूर मार्च महिन्यात मात्र त्यांच्या सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने मेळघाटात परततो.

आठ दिवस होळीचा उत्सव मेळघाटात साजरा होतो. त्यानंतर पुन्हा हे आदिवासी बांधव कामाच्या शोधात बाहेर पडतात. या आदिवासींना मजुरीच्या पैसे मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. असाच प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मेळघाटातील खडीमल या गावातील काही मजूर हे धाराशीव जिल्ह्यात ऊस तोडणीच्या कामासाठी गेले आहेत.

होळीचा सण तोंडावर आल्याने मजुरीचे पैसे मिळावेत आणि सण साजरा करण्यासाठी गावी परतता यावे, यासाठी त्यांची तगमग सुरू आहे. पण, त्यांना मजुरीचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला मुकादमाशी मोबाईलवरून संवाद साधला. मजुरीचे पैसे का मिळाले नाहीत, अशी विचारणा केली.त्यावर मुकादम हा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी मुकादमाला संबंधित मालकाचा मोबाईल क्रमांक मागितला आणि थेट मालकाशीच चर्चा केली. खडीमल येथील मजूर होळी सणासाठी परत आपल्या गावी येण्यासाठी इच्छूक आहेत आणि त्यांना मजुरीचे पैसे अद्याप का देण्यात आले नाहीत, अशी विचारणा बच्चू कडू यांनी केली.

त्यावर गायकवाड नावाच्या व्यक्तीने मजुरांना अग्रीम रक्कम आपण दिली, नंतर पूर्ण रक्कमही दिली, असा दावा केला. पण, मजुरांना परत का येऊ दिले जात नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा दम बच्चू कडू यांनी दिला. या दोघांमधील संवादाचे चित्रिकरण समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. बच्चू कडू यांनी थेट धाराशीव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे या चित्रफितीत दिसून येत आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू हे येत्या १ मार्चपासून मेळघाटात पदयात्रा काढणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande