
पुणे, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) : पाली भाषेला २०२४ मध्ये अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या संवर्धन आणि प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पद्मपाणी फाउंडेशन प्रणित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने “राष्ट्रीय पाली गौरव पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला असून त्यासाठी देशभरातून नामांकन मागविण्यात येत आहे.
पाली भाषा, बौद्ध अध्ययन आणि संबंधित संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक, संशोधक, साहित्यिक आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रविवार, २२ मार्च २०२६ रोजी पुणे येथे आयोजित अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन मध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनास देशभरातील पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील विद्वान, प्राध्यापक, संशोधक तसेच अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाली तज्ज्ञ, ज्येष्ठ विचारवंत आणि विविध विद्यापीठांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पात्रता निकष
देशातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांमधील पाली भाषा विभाग किंवा बौद्ध अध्ययन विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुख, संशोधक तसेच पाली साहित्य निर्मिती, ग्रंथ संपादन, अनुवाद, अभ्यासक्रम विकास किंवा पाली भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र राहतील.
नामांकन प्रक्रिया
या पुरस्कारासाठी स्वयं-नामांकन (Self-Nomination) करता येईल तसेच पाली विभागप्रमुख किंवा सहकाऱ्यांकडूनही नामांकन सादर करता येणार आहे. नामांकन फॉर्म पूर्ण भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे — जसे की सविस्तर परिचयपत्र (CV), प्रकाशित पुस्तके किंवा संशोधन निबंध, कार्याचा पुरावा इत्यादी जोडणे आवश्यक आहे.
नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. नामांकन फॉर्म आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी rahuldambale@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा किंवा ९८२२०९८८७० या अधिकृत क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष आवाहन
पाली भाषा संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील योग्य आणि पात्र उमेदवारांची नावे पुढे करावीत, असे विशेष आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुख्य संयोजक राहुल डंबाळे यांनी सांगितले की, “पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी अशा पुरस्कारांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विद्वानांचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. देशभरातील पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील सर्व अभ्यासकांनी सक्रिय सहभाग नोंदवून योग्य उमेदवारांचे नामांकन सादर करावे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर