
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सोनपेठ तालुक्यात ७१६ हेक्टर तर गंगाखेड तालुक्यात ६५ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून एकूण ७८१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.
अवकाळी पावसाने काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांना फटका बसला आहे. ज्वारी आडवी पडल्यानेआणि गव्हाला ओलावा लागल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पूर्णा, पालम आणि मानवत तालुक्यातही पिकांचे नुकसान शेतकऱ्यांकडून दिली जात असताना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे सध्या केवळ सोनपेठ व गंगाखेड तालुक्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. इतर तालुक्यांतील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इतर भागातील नुकसानीची अधिकृत नोंद कधी होणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis