ट्रान्सपोर्टर्सचा एल्गार; 5 मार्चला 1 लाख वाहनांसह चलो आझाद मैदान
नवी मुंबई, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। सरकारने 8 महिन्यांपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. आता आमचा संयम सुटला असून, येत्या 5 मार्चला राज्यभरातून 1 लाखाहून अधिक वाहने मुंबईतील आझाद मैदानावर धडकतील. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याच दिव
ट्रान्सपोर्टर्सचा एल्गार; 5 मार्चला 1 लाख वाहनांसह चलो आझाद मैदान


नवी मुंबई, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। सरकारने 8 महिन्यांपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. आता आमचा संयम सुटला असून, येत्या 5 मार्चला राज्यभरातून 1 लाखाहून अधिक वाहने मुंबईतील आझाद मैदानावर धडकतील. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याच दिवसाच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत बंद केला जाईल, असा खळबळजनक इशारा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीने दिला आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आता हा लढा देशव्यापी होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीने गुरुवारी दुपारी एपीएमसीतील माथाडी भवन येथे राज्यभरातील विविध ट्रान्स्पोर्ट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक आणि इतर पदाधिकाऱयांनी सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. 40 हजारांच्या गाडीवर 80 हजारांचे ई-चलन लादले जात आहे. हे अन्यायकारक ओझे वाहतूकदार कसे सोसणार? सरकारने आम्हाला शेतकऱयांसारख्या आत्महत्येच्या उंबरठÎावर उभे केले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही 10 वेळा सरकारची भेट घेतली, पण पदरात फक्त आश्वासनेच पडली. आता चर्चा नाही, थेट कृती होईल. 5 तारखेला महाराष्ट्र थांबणार!

जर 5 मार्चला प्रशासनाने गाडी अडवल्या, तर जिथे गाडÎा अडवल्या जातील, तिथेच गाडÎा सोडून देऊन रस्ते जाम करु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कायद्यानुसार 90 दिवसांत केसेस कोर्टात न पाठवल्यास त्या रद्द कराव्यात, ही तरतूद पाळली जात नाही. 8 महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या कमिटीचा अहवाल अद्याप का आला नाही? असा सवाल वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे. सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा होऊनही तिथे वसुली सुरुच असल्याचा आरोप यावेळी वाहतूकदारांनी केला. आजपासून प्रत्येक वाहनावर निषेधाचे पोस्टर आणि काळे झेंडे लावले जातील, तसेच प्रत्येक वाहतूकदार निषेधाची टोपी घालून आपला विरोध दर्शवेल असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बोकी या संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितले.

हे केवळ ट्रान्सपोर्टर्सचे आंदोलन नसून सर्वसामान्य वाहनचालकांचे आंदोलन असल्याचे प्रसन्न यांनी सांगितले. ई-चलन आणि जाचक नियमांचा त्रास रिक्षा, टॅक्सी, बस आणि वैयक्तिक कार चालवणाऱया प्रत्येकाला होत आहे. त्यामुळे हे एक जनआंदोलन असून सर्व जनतेने यात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande