
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे अपघातामुळे झालेल्या नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना, विमा कंपनी मार्फत लागू करण्यात आलेले आहे. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या बैठकीमध्ये एकूण १६ विद्यार्थ्यांसाठी सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे १० आणि माध्यमिक विभागाचे ६ असे एकूण १६ विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना लाभ मंजूर करण्यात आला.
अपघाती मृत्यू झाल्याने सहा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना.तसेच अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे एकूण तीन विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत अर्थसाह्य,इतर कारणामुळे यात आजारी असल्याने, सर्पदंश, पोहताना किंवा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे एकूण सात विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना हे सानुग्रह अनुदान लाभ मंजूर करण्यात आला.
शेततळ्यात पडून मृत्यू होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.
ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या मृत्यू हे शेततळ्यात पडून होत असल्याचे निदर्शनात येत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यात आले आहे तिथे आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये दोऱ्या टाकण्याचे निर्देश दिले.पर्यायी व्यवस्था म्हणून लाईफ जॅकेट, किंवा अशी व्यवस्था करावी की जेणेकरून त्याला धरून जीव वाचवता येईल अशी उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
या बैठकीस शिक्षणाधिकारी (योजना)राकेश साळुंखे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, उपशिक्षणाधिकारी दिपाली थावरे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारुती म्हस्के ,पोलीस प्रशासनाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis