
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील अनेक एस.टी. बसस्थानकांवरील संपर्क व्यवस्था ठप्प असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सूचना फलकावर दिलेले किंवा अधिकृत संकेतस्थळावर नमूद असलेले अनेक दूरध्वनी क्रमांक बंद असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संपर्क व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उद्योजक किशोर पुकाळे, आयकर सल्लागार अर्चना जोशी तसेच सुराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील अनेक एस.टी. बसस्थानकांवरील सूचना फलक किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेले संपर्क क्रमांक बंद असतात किंवा फोन केल्यानंतर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वेळ, सेवा किंवा इतर आवश्यक माहिती मिळवताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.या संदर्भात यापूर्वी जानेवारी महिन्यातही प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पुन्हा एकदा निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड