
बंगळुरु, 18 मार्च (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील झाला आहे. कोहली बुधवारी बंगळूरुमध्ये दाखल झाला. संघ व्यवस्थापन, क्रिकेटपटू आणि चाहते त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. बंगळूरुमध्ये येण्यापूर्वी कोहली लंडनमध्ये सराव करत होता. कोहलीने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरावाचा एक फोटो देखील पोस्ट केला, जो आरसीबीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला. कोहलीच्या संघात सामील झाल्यामुळे सराव सत्रांना आणखी गती मिळणार आहे.
आरसीबी चॅम्पियन म्हणून आयपीएल २०२६ मध्ये प्रवेश करेल. आपले विजेतेपद टिकवणे हे संघाचे मुख्य ध्येय असेल. आरसीबीने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रँचायझीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या कोहलीने गेल्या हंगामात १५ सामन्यांमध्ये ५४.७५ च्या सरासरीने आणि १४४.७१ च्या स्ट्राइक रेटने ६५७ धावा केल्या. या काळात त्याने आठ अर्धशतके झळकावली. कोहलीने ६६ चौकार आणि १९ षटकारही मारले.
जर आरसीबीला आयपीएल २०२६ मध्ये आपले विजेतेपद टिकवायचे असेल, तर विराट कोहली महत्त्वाची भूमिका बजावेल. संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा त्याच्याकडून डावाच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची अपेक्षा करेल.
विराट कोहली आरसीबीच्या पहिल्या हंगामापासूनच संघाशी जोडलेला आहे. त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. तो जवळपास प्रत्येक वर्षी संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला आहे. कोहली लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सर्वाधिक धावा आणि शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कोहलीने २६७ सामन्यांमध्ये आठ शतके आणि ६३ अर्धशतकांसह ८,६६१ धावा केल्या आहेत. विराटने २०१३ ते २०२१ पर्यंत आरसीबीचे कर्णधारपदही भूषवले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी २०१६ च्या अंतिम फेरीत पोहोचली होती, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.
मागील हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आपले पहिले विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीचे चाहते पाटीदारच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर लक्ष ठेवून असतील. बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यातील हंगामातील पहिला सामना २८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे