
बीड, 22 मार्च (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेली ऊस बिले आणि एफआरपीची रक्कम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. थकीत देयकांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून आंदोलन केले होते, ज्याची दखल घेत शुक्रवारी कारखाना प्रशासनासोबत तातडीची बैठक घेण्यात आली. नियमानुसार गाळप झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ही रक्कम देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी ती थकवली आहे. आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा आढावा बैठक घेऊन प्रत्यक्ष पेमेंटची स्थिती तपासली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून यामुळे हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis