
अमरावती, 22 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील वरुड - मोर्शी रोडवरून गायीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. या तस्करी करणार्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदे (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार अनिल बोंडे यांनी पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनातून केली आहे. मागील तीन महिन्यापासून अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड - मोर्शी या रस्त्यावरून गाईची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. टेम्पोट्रक्स सारख्या गाड्यांमध्ये जनावरांना दाबून त्यांची तस्करी केली जाते. अतिशय वेगाने या गाड्या जातात. यावरच प्रतिबंध करणेकरिता आपणच गौरक्षा पथक निर्माण केले होते.
परंतु, काही कारणामुळे आता गौरक्षा पथक बरखास्त करण्यात आले असे समजते. त्यामुळे तस्करीवर आता कोणताही निर्बंध राहलेला नाही. गायीची तस्करी करीत असताना त्यांना पकडणे, आणणे, हिवरखेड येथील नागठाणा जवळ एकत्र करून त्या गाड्यांमध्ये नेणे ही संपूर्ण काम एका माणसाचे नाही. पुढे विविध वाहनांमधून आणालेली जनावरे अमरावतीत आणल्यानंतर लालखडी येथे नेली जातात. तेथे गाईंची कत्तल करणे आणि मास विकणे इथपर्यंत ही संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या (मकोका) अंतर्गत या सर्व तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात यावे.
नागठाणा आहे मुख्य केंद्र
हिवरखेड येथील नागठाणा जवळ अब्दुल रहीम कुरेशी या व्यक्तीने शेत विकत घेऊन तिथे गाईंना जमा केले जाते आणि त्या ठिकाणी गाड्या भरल्या जातात. गायी तिथे जमा होत असताना गाड्या भरताना पोलिसांनी छापा टाकणे आवश्यक आहे आणि संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त त्याच ठिकाणी होऊ शकतो. त्याचप्रमाणे वरुड मधील मध्यप्रदेश सीमेवर मुख्य रस्त्याशिवाय जे रस्ते आहे, त्यावरून या गाड्या भरधाव वेगाने नेल्या जातात आणि अमरावतीपर्यंत पोहोचतात. या सर्व प्रकारांमध्ये एका गाडीच्या पाठीमागे पंधरा ते वीस लोक काम करतात. त्यांचा बंदोबस्त मकोका लावल्याशिवाय होणार नाही आणि म्हणून या सर्वांवर कारवाई करण्यात यावी. पुन्हा गौरक्षा पथक कार्यान्वीत करावे, अशी मागणी खा. बोंडे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी