
अमरावती, 23 मार्च (हिं.स.)राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे प्रशासकीय कामांचा भार कमी होऊन नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. मात्र अचलपूर जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळणे अचलपूरच्या दृष्टीने शासनाचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अचलपूरसह राज्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. आमदार प्रवीण तायडे यांनी अचलपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून नुकताच सरकारने त्याला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अचलपूर उपविभागासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील नागरिकांना १०० ते १५० किमी अंतरावरून जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. या अडचणी लक्षात घेता आमदार प्रवीण तायडे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे नागरिकांना सातबारा, फेरफार, नामांतरण, दाखले यासारख्या कामांसाठी वारंवार जिल्हा ठिकाणी जावे लागणार नाही. अचलपूर येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर महसूल संबंधित कामे स्थानिक स्तरावरच होणार असून नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. महसूल कार्यालयावरील गर्दी कमी होऊन प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाच तालुक्यांना लाभ होणार
अचलपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार असून नवपदनिर्मितीमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. सोबतच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. महसूल कार्यालयावरील गर्दी कमी होऊन प्रलंबित कामे लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आमदार प्रवीण तायडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी