
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। मौजे पिंपळगाव येथे दरवर्षी भरविण्यात येणारा श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, तो आता श्रद्धा, संस्कार आणि समाजजागृतीचा विराट महोत्सव ठरत आहे. या सप्ताहाच्या वाढत्या भव्यतेला आणि लाखो भाविकांच्या ओघाला लक्षात घेता राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी मिळविण्यासाठी स्थानिक आमदार बाबुराव कोहळीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. सदर निधीचा अध्यादेश पिंपळगाव येथील श्री दत्त संस्थानच्या पिठाधीश्वरांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा सप्ताह अधिक नियोजनबद्ध, सुसज्ज आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत पिंपळगाव येथील सप्ताहाने अभूतपूर्व उंची गाठली आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सात दिवसांच्या कालावधीत दहा लाखांहून अधिक भाविक येथे दर्शन, श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. दररोज हजारो भाविकांना वरण-भात, पोळी, भाजी आणि गोड पदार्थाचा महाप्रसाद दिला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भक्तांची व्यवस्था करणे ही मोठी जबाबदारी बनली होती. शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे आता निवास, पाणी, स्वच्छता, भोजन व्यवस्था आणि वाहतूक यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे. यावेळी बोलताना आ. बाबुराव कोहळीकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजच्या बदलत्या काळात अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची गरज अधिक भासते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis