ई-गव्हर्नन्स आणि एआयद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची लोकाभिमुख क्रांती
कोल्हापूर, 28 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामात जी गती आणली आहे, ती संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यां
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ई - गव्हर्नस आणि एआय तंत्रज्ञान


कोल्हापूर, 28 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामात जी गती आणली आहे, ती संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या ई-गव्हर्नन्स सुधारणांमुळे सरकारी कार्यालय आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी झाले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ डिजिटलायझेशन नसून, त्याद्वारे प्रत्येक सामान्य माणसाला पारदर्शक, जलद आणि भ्रष्टाचारमुक्त सेवा मिळवून देणे हा आहे.

प्रशासनाचा आरसा समजले जाणारे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ (https://kolhapur.gov.in) आता जागतिक मानकांनुसार विकसित करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ केवळ माहिती देत नाही, तर ते अत्यंत प्रतिसादात्मक आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर, या वेबसाईटचा 'पेज लोड स्पीड' मोबाईलवर केवळ ३ सेकंद आणि डेस्कटॉपवर ३.७ सेकंद इतका वेगवान आहे. मागील आठ महिन्यांच्या अल्प कालावधीत ११,७२,२६२ अभ्यागतांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे, जे याची उपयुक्तता सिद्ध करते. सामान्यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे यावरील 'बहुभाषिकता'. मराठी, इंग्रजी आणि हिंदीसह इतर २३ भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दिव्यांगांसाठी 'फॉन्ट साईज' बदलणे आणि 'हाय कॉन्ट्रास्ट' सारखी वैशिष्ट्ये देते. नागरिकांच्या मनात अनेकदा सरकारी कामांबाबत शंका असतात, त्या दूर करण्यासाठी संकेतस्थळावर विविध विभागांचे एकूण ४७१ 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न' (FAQs) उपलब्ध आहेत. यामध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे १९५, जमिनीशी संबंधित ५५ आणि पुरवठा विभागाचे २५ प्रश्न समाविष्ट आहेत. यामुळे नागरिकांना किरकोळ माहितीसाठी कार्यालयात येण्याची गरज उरलेली नाही.

सरकारी कामात होणारी दिरंगाई हा सर्वसामान्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय असतो. मात्र, कोल्हापूर प्रशासनाने 'आपले सरकार' पोर्टलचे १००% एकात्मिकरण करून १६ अधिसूचित सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात प्रशासनाला ९,९६,३०२ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी ९,७०,१२४ सेवा (९७.३७%) विहित वेळेत पूर्ण करण्यात आल्या आहेत. सेवा वेळेत न मिळाल्यास अपील करण्याची सोयही उपलब्ध असून, प्रथम अपिलाचे प्रमाण केवळ ०.००८% इतके नगण्य आहे, जे प्रशासकीय तत्परतेचे लक्षण आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी ११० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १००% प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यातील ८५० 'आपले सरकार' सेवा केंद्र चालकांपैकी ६९३ जणांना प्रशिक्षित करून गावपातळीवर सेवा पोहचवली जात आहे.

ई-ऑफिस आणि प्रक्रिया सुधारणा

जिल्हाधिकारी कार्यालयाने 'ई-ऑफिस' प्रणालीचा स्वीकार करून कागदमुक्त (Paperless) प्रशासनाकडे पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील २०२, प्रांत कार्यालयातील ५७ आणि तहसील कार्यालयातील ३०३ कर्मचारी १००% सक्रियपणे ई-ऑफिसचा वापर करत आहेत. आतापर्यंत १,५४,६१० पत्रे आणि फाईल्स ई-ऑफिसमध्ये प्राप्त झाल्या, ज्यापैकी १,४१,३०६ (९१.३९%) फाईल्सचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. फाईल निपटारा करण्याचा सरासरी वेळ आता १८ दिवस २१ तास इतका कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 'प्रक्रिया ऑप्टिमायझेशन' (GPR). नागरिकांना विविध परवानग्यांसाठी पूर्वी अनेक कागदपत्रे जोडावी लागत असत. प्रशासनाने ही संख्या कमी केली आहे. उदाहरणार्थ, जमीन खरेदी-विक्री परवानगीसाठी पूर्वी २१ कागदपत्रे लागत होती, ती आता १२ करण्यात आली आहेत. बिगरशेती (NA) परवानगीसाठी १५ ऐवजी आता केवळ १० कागदपत्रे लागतात. या बदलामुळे सामान्य माणसाचा त्रास आणि एजंटवरची अवलंबित्व कमी झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि 'सेवादूत' चॅटबॉट

कोल्हापूर प्रशासन आता 'स्मार्ट ऑफिस' संकल्पनेवर काम करत आहे. यामध्ये ChatGPT, Gemini आणि Google AI Studio सारख्या प्रगत जनरेटिव्ह एआय साधनांचा वापर क्लिष्ट अहवाल तयार करण्यासाठी आणि बहुभाषिक अनुवादासाठी केला जात आहे. यामुळे मानवी त्रुटी ४०% ने कमी होण्याचा आणि निर्णय प्रक्रियेत ३०% ने वेग येण्याचा अंदाज आहे. सामान्य नागरिकांसाठी 'सेवादूत २.०' (९०९६०७४७९९) हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट एक वरदान ठरत आहे. या चॅटबॉटला १,८०,१२४ हिट्स मिळाले आहेत. याद्वारे नागरिक आपले सरकार केंद्र शोधू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात आणि विविध योजनांची माहिती घेऊ शकतात. विशेष म्हणजे, हा चॅटबॉट आपत्ती व्यवस्थापनात रिअल-टाइम माहिती देण्यासाठी आणि अफवांचे निर्मूलन करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. महसुली वादांमध्ये जलद निकालासाठी 'AI मित्र' किंवा 'AI कोर्ट असिस्टंट' ची मदत घेतली जात आहे, ज्यामुळे प्रकरणांची स्थिती तपासणे आणि कायदेशीर मसुदा तयार करणे सुलभ झाले आहे.

जीआयएस (GIS) आणि सार्वजनिक सुरक्षा

भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा वापर करून कोल्हापूरने १३ वेगवेगळ्या क्षेत्रांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामध्ये रेशन दुकाने, आधार केंद्रे आणि शाळांचे मॅपिंग करण्यात आले आहे. ज्या भागात या सुविधा नाहीत, तिथे नवीन केंद्रे सुरू करण्यासाठी 'गॅप ॲनालिसिस' केले जाते. आपत्ती व्यवस्थापनात २०१९ आणि २०२१ च्या पुराचा डेटा वापरून नदीकाठच्या गावांचे जिओ-फेन्सिंग करण्यात आले आहे. यामुळे पूर येण्यापूर्वीच केवळ बाधित होणाऱ्या गावांना 'रिस्क अलर्ट' पाठवणे शक्य होणार आहे. 'कार्यालय कवच' आणि 'स्मार्ट गर्दी व्यवस्थापन' अंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसरात रिअल-टाइम हीटमॅप्सद्वारे गर्दीचे नियंत्रण केले जाते, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळता येतात.

तक्रार निवारण: ९८% यशस्वी दर

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने डेटा ॲनालिटिक्सचा वापर सुरू केला आहे. ५ डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान ५४१ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यापैकी ५३९ (९८%) तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. तक्रारींचे वर्गीकरण केले असता, सर्वाधिक १७० तक्रारी कर्मचारी वर्तणुकीबाबत आणि ७२ तक्रारी भूसंपादन मोबदल्याबाबत होत्या. या डेटाच्या आधारे प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन जून महिन्यात (शालेय प्रवेशाच्या वेळी) होणारी तक्रारींची संभाव्य वाढ लक्षात घेऊन आधीच नियोजन केले आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा हा १५० दिवसांचा कृती आराखडा ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सामान्य माणसाचे अधिकार अधिक सक्षम करणारा आहे. ई-ऑफिसमुळे आलेली पारदर्शकता, AI मुळे आलेला वेग आणि GIS मुळे मिळालेली अचूकता यांमुळे कोल्हापूर जिल्हा आज डिजिटल प्रशासनाचे एक दीपस्तंभ बनला आहे. यामुळे केवळ प्रशासकीय खर्च ५०% ने कमी झाला नसून, नागरिकांचा सरकारवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande